Ahilyanagar News: भंडारदरा अभयारण्यालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांकडून शेतपिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. रानडुक्कर, हरीण, गवा, माकड आदी वन्यप्राणी शेतात घुसून उभी पिके उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतांची तत्काळ पाहणी करून पंचनामा करावा व शासनाकडून योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. वन्यप्राण्यांनी भंडारदरा अभयारण्यालगत असलेल्या राजूर, मवेशी, साम्रद, घाटघर परिसरातील शेतकऱ्यांच्या ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान केले आहे, तर माकडांच्या उपद्रवामुळे फळपिकांचेही नुकसान होत आहे.
या भागातील बहुतांश शेतकरी लहान व सीमांत असल्याने शेती हाच त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा संकटांनंतर आता वन्यप्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत.
अनेकांनी पीक कर्ज काढून शेती केली असून, पिके नष्ट झाल्याने कर्जफेडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
नुकसानग्रस्त शेतांची तत्काळ पाहणी करून पंचनामा करावा, शासनाकडून योग्य नुकसानभरपाई द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे मानवी वस्ती आणि शेती क्षेत्रात त्यांची वर्दळ वाढली आहे.