बसरूरच्या जवळून वाहणार्या वराही नदीतून फिरंग्यांचं एक जहाज पुढे चाललं होतं. इक्केरीमधील तरण्याबांड सुंदर स्त्रियांना बंदिवान करून फिरंगी दलालांनी पोर्तुगालला पळवून न्यायचा कट केला होता. तेच हे जहाज होतं. राजांनी तरांडी आणि छोट्या नावांमधून सशस्त्र सैनिकांच्या पलटणी सागरातून धाडल्या. सैनिकांनी फिरंगी जहाजाला वेढा घातला. ‘हर हर महादेव’ हा घोष करत मावळ्यांनी पोर्तुगीज दलालांना कंठस्नान घातलं. सर्व लेकीबाळींची सुटका केली. दुसर्या योजनेप्रमाणे मावळे तरांड्यांमधून बसरूरच्या भूमीवर उतरले. हलक्या तोफा नेण्यात आल्या. पहाट होण्यापूर्वीच पोर्तुगीज सैनिकांवर हल्ला चढवला. बेसावध सैनिकांना कैद केलं. जे लढले, त्यांना यमसदनी पाठवलं. कमी वेळेची, पण जोरदार लढाई झाली. शिवाजी राजांनी बसरूरच्या पोर्तुगीजांच्या ठाण्यावर कब्जा मिळवला. पोर्तुगीजांनी निरपराध प्रजेच्या गुलामगिरीसाठी बनवलेले लाकडी पिंजरे राजांनी मोडून काढून प्रजेची सुटका केली. बावीस वर्षे वयाचा राजा सोमशेखर आपल्या रूपसुंदर चेन्नम्मा राणीला घेऊन शिवरायांच्या दर्शनाला आला. राजांनी त्याचं राज्य त्याच्या हाती सोपवलं. त्याच्या संपत्तीपैकी एका कवडीलाही राजांनी हात लावला नाही. शिवरायांच्या मनोरंजनासाठी सोमशेखरनं कलावती नामक सौंदर्यवान कलावंतिणीचं नृत्य आयोजित केलं होतं. शिवरायांनी या नृत्यगायनाच्या सोहळ्याला उपस्थित राहायला ठामपणे नकार दिला. इतकेच नव्हे, तर सोमशेखर राजाच्या खांद्यावर हात ठेवून राजे म्हणाले, ‘सोमशेखर, आपली राणी चेन्नम्मा या रूपवती आहेत, गुणवती आहेत. त्यांना नीट सांभाळा. रंगाढंगाच्या नादात किती वाहवत जायचं आणि आपल्या राजगादीचं पावित्र्य किती जपायचं, याचा गांभीर्यानं विचार करा.’ पोर्तुगीजांनी लुटलेला दोन कोटी होनांचा खजिना आणि पोर्तुगीज बनावटीच्या उत्कृष्ट बारा तोफा हा ऐवज घेऊन स्वराज्य निर्मितीच्या पुढील कार्यासाठी मावळ्यांसह शिवाजीराजे रवाना झाले.