Agricultural Export News: परभणी : जिल्ह्याच्या विकासासाठी कृषी, उद्योग तसेच सेवा या क्षेत्रांचा संतुलित प्रगतीची गरज आहे. शेतीमालाच्या मुल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योग उभारणी आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर देत शेतीमालाच्या निर्यात वाढीसाठी शेतकरी, उद्योजक आदींना एकत्रित प्रयत्न करावे लागतील असा सूर मंगळवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालायात आयोजित ‘महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६’ कार्यशाळेत उमटला.
उद्योजकांना सर्व योजनांची माहिती एकाच मंचावार उपलब्ध व्हावी यासाठी विविध विभागांच्या सहकार्याने उद्योजक व नव उद्योजकांसाठी ‘महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६’ एकदिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे, नांदेड येथील उपविभागीय कार्यालयातील अधीक्षकीय उद्योग अधिकारी अमोल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या प्रतिनिधी प्रियांका गवई, ई-ॲण्ड वायचे सल्लागार समन्वयक सूरज जाधव, आयडीबीआयचे अधिकारी हरिकिशन, टपाल विभागाचे अधिकारी गणेश देशमाने, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. क्षीरसागर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, की परभणी जिल्हा उदयोन्मुख म्हणून ओळखला जात असून ‘एक जिल्हा एक उत्पादन’सारख्या योजनांद्वारे स्थानिक उत्पादनांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची चांगली संधी आहे. तरुण उद्योजक, महिला व सर्व संबंधित घटकांनी पुढाकार घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. जिल्ह्याला निर्यातक्षम तसेच औद्योगिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सहकार्य करावे. मैत्री कक्षाच्या अप्पर जिल्हाधिकारी मनिषा कुंभार म्हणाल्या, की मैत्री पोर्टलद्वारे उद्योजकांना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
दौलत चव्हाण म्हणाले, की सोयाबीन, कापसावर आधारित उद्योगांना संधी आहेत. जिल्ह्यात जिनिंग मिल भरपूर आहेत. स्पिनिंग मिल तसेच कापड निर्मिती उद्योग सुरु झाले पाहिजेत. गवई म्हणाल्या, की निर्यातीसाठी केंद्र तसेच राज्य सरकारे भरपूर प्रोत्साहन देत आहेत. निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण उत्पादने आवश्यक आहेत. देशमाने म्हणाले, की पोस्टाद्वारे पार्सल करून निर्यात केली जात आहे. त्यासाठी परभणी व हिंगोली येथे डाक निर्यात केंद्र आहेत. डॉ. क्षीरसागर म्हणाले, की प्रक्रियेतून मूल्यवर्धन होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान २५ टक्के शेतीमालावर प्रक्रिया केली पाहिजे. प्रास्ताविकात बळे यांनी उद्योजकांमध्ये निर्यातीबाबत जागरूकता निर्माण करणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. कार्यशाळेस सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक, निर्यातदार, नवउद्योजक, औद्योगिक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, प्रक्रिया उद्योग केंद्रांचे प्रतिनिधी, बँका तसेच विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले होते.