‘हवामान कृती आराखडा’
मंगळवारी प्रकाशन
रत्नागिरी : महाराष्ट्र शासन आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचे ज्ञान भागीदार म्हणून आय फॉरेस्ट (”iFOREST”) संस्थेने जिल्ह्याचा ‘विकास-सह-हवामान कृती आराखडा’ तयार केला आहे. या आराखड्याचे अधिकृत प्रकाशन आणि त्यावरील सादरीकरण व चर्चासत्राचे आयोजन मंगळवारी (ता. २४) दुपारी ३ ते ६ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आराखड्याचे प्रकाशन होईल. या आराखड्यामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांना हवामान अनुकूलन, कमी-कार्बन वाढ, परिसंस्था व्यवस्थापन आणि आपत्ती जोखीम कमीकरण यासोबत एकात्मिक करून एक दीर्घकालीन एकसंध चौकट तयार केली आहे. ‘कार्बन-न्यूट्रल आणि हवामान-तटस्थ भविष्याकडे वाटचाल’ हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या संवादसत्रात स्थानिक स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत व पंचायतराज संस्था, नागरी समाज संस्था आणि समुदाय प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
————–
मुरूडकर, तोडणकर
निबंध स्पर्धेत प्रथम
रत्नागिरी ः झेप फाउंडेशनतर्फे आयोजित रत्नागिरी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सोहळा पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात झाला. कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी सूर्यवंशी, डाएटच्या वरिष्ठ अधिव्याख्यात्या दीपाली सावंत, नगरसेविका वर्षा ढेकणे उपस्थित होते. या स्पर्धेचा निकाल असा ः छोटा गट- दुर्वा मुरूडकर (फाटक हायस्कुल), त्रिशा तांबे (शिर्के हायस्कूल), क्रियांश गोरिवले (सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय). मोठा गट- राधिका तोडणकर (पटवर्धन हायस्कूल), श्रावणी पाटील (कुर्धे हायस्कूल), वीरश्री कानडे (पटवर्धन हायस्कूल). या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, शिल्ड, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
———
संस्कृत प्रज्ञा परीक्षेत
भाविक कांबळी प्रथम
चिपळूण : येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ व रवीकीर्ती संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे आयोजित संस्कृत प्रज्ञा शोध परीक्षेत भाविक भूषण कांबळी यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला आहे. परीक्षेत शाळेतील दहावीचे एकूण ३४ विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व शाळास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. भाविक कांबळी यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक बनसोडे, पर्यवेक्षिका कारदगे, सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.