
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापले आहे. निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असताना भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत यांना प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेवर पुन्हा निवडून येऊ नये असे वाटत असून त्यासाठी ते वेगळी राजकीय खेळी करत असल्याचा आरोप बन यांनी केला. या संदर्भात त्यांनी शरद पवार यांचे नाव पुढे केले जात असल्याचा दावा करत, हा सगळा प्रकार अंतर्गत राजकारणाचा भाग असल्याचे सूचित केले. बन यांनी असा आरोप केला की, राऊत यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत लवकरच संपणार आहे. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी पुन्हा निवडून आल्यास स्वतःची संधी कमी होईल, अशी भीती त्यांना वाटत असावी. यामुळेच ते विविध कारणे पुढे करत वेगळे राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बन यांनी म्हटले. उबाठा गटाला राज्यसभेची जागाच मिळू नये, अशीच त्यांची इच्छा दिसून येते, असेही ते म्हणाले. या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात नवे वादळ उठले आहे. दरम्यान, उबाठा गटातील दुसरे नेते आदित्य ठाकरे यांनी रोटेशन पद्धतीनुसार पक्षाला राज्यसभेवर प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी केल्याचेही बन यांनी नमूद केले. यावरून पक्षांतर्गत मतभेद उघड होत असल्याचा दावा त्यांनी केला. एकीकडे रोटेशनची भूमिका मांडली जात असताना दुसरीकडे वेगळीच रणनीती आखली जात असल्याचे चित्र दिसते, असे ते म्हणाले. त्यामुळे उबाठा गटात एकमत नसल्याचे त्यांनी सूचित केले. संजय राऊत मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करून प्रियंका चतुर्वेदी यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही बन यांनी केला. मराठी कार्ड, वापरून राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. राज्यसभेच्या जागेवरून सुरू असलेली ही चर्चा आता वैयक्तिक आणि अंतर्गत स्पर्धेत रूपांतरित झाल्याचे चित्र आहे, असा टोला त्यांनी लगावला. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांचाही उल्लेख करत बन यांनी दावा केला की, शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपले आहेत, तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत आघाडी करून त्या विचारांशी गद्दारी केली. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.