
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाविरोधात परभणी जिल्ह्यात मोठा विरोध होत आहे. जिल्ह्यातील सहजपूर जवळा येथील शेतकरी शुक्रवारी या महामार्गाविरोधात करस्त्यावर उतरले. आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला, अशी संतप्त नारेबाजी हे शेतकरी करत आहेत. त्यामुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. गंभीर गोष्ट म्हणजे या गावात एकूण लोकसंख्येपेक्षा पोलिसांचा फौजफाटा जास्त झाला आहे. यावरून या घटनेची दाहकता स्पष्ट होते. शक्तीपीठ महामार्गाद्वारे राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडण्यात येणार आहे. पण राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. या विरोधामुळे सरकारनेविधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) भूसंपादनाला विरोध करणाऱ्या कागल व हातकणंगले तालुक्याचा एक मोठा भाग या महामार्गातून वगळला. याशिवाय नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व धाराशिव जिल्ह्यातही काही बदल करण्यात आले. पण शेतकऱ्यांचा विरोध कमी झाला नाही. सहजपूर जवळ्यात गावकरी कमी पोलिस जास्त आता परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा येथील शेतकरीही या प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरलेत. त्यांनी या प्रकल्पाच्या भूसंपादनाला जोरदार विरोध केला आहे. सहजपूर जवळा गावची लोकसंख्या 365 एवढी आहे. पण सध्या या गावात 600 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलिसांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या काही शेतकऱ्यांना गुरुवारी मध्यरात्री तापब्यात घेतले. त्यांना ताडकळस व दैठणा पोलिस ठाण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस प्रशासनावर दंडेलशाहीचा आरोप शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना यापूीर्वी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. पण त्यांनी त्या स्वीकारण्यास नकार दिला होता. अखेर प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्री कलम 168 अन्वये त्यांच्या घरावर नोटीसा चिटकवल्या. तसेच बीएनएस 163 अंतर्गत गावात निर्बंध लागू करून गटधारकांशिवाय इतरांना प्रवेशबंदी करण्याचा आदेश जारी केला. प्रशासनाच्या या दंडेलशाहीविरोधात आज मोजणीला विरोध दर्शवण्यासाठी वृद्ध, महिला, युवक आदी शेतकरी कुटुंब मोठ्या संख्येने रस्त्यावर उतले. यावेळी त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी व रास्ता रोको केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले. यावेळी काही ग्रामस्थांनी टोकाचे पाऊल उचलण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व शासकीय कामकाज पार पाडण्यासाठी योग्य ती उपाययोजना केल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, ग्रामस्थांचा रोष व पोलिसांची मोठी उपस्थिती यामुळे परिस्थिती अतिशय संवेदनशील बनली आहे. राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांवर टीका शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आज होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या महामार्गाच्या प्रकल्पात 50 हजार कोटींचा ढपला पाडायचा असल्याने रात्रीच शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या पदाधिकारी , शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष यांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांना हातशी धरून करत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या तालिबानी भूमिकेचा जाहीर निषेध, असे त्यांनी म्हटले आहे.