
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) भूमिकेवर सविस्तर भाष्य केले. तसेच समिटदरम्यान त्यांनी हलक्या फुलक्या शब्दांत राजकीय विरोधकांवरही टीका केली. कधी कधी मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, तेव्हा AI मदत करू शकते, असे म्हणत त्यांनी विरोधकांना कोपरखळी लगावली. याशिवाय, हा AI समिट भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. वेगाने बदलणाऱ्या AI क्षेत्रात भारताने साधलेली प्रगती जगासमोर मांडण्याची ही संधी असल्याचे ते म्हणाले. विविध क्षेत्रांमध्ये क्रांती घडवणाऱ्या AI संदर्भात जागतिक नेते भारतात येऊन चर्चा करत आहेत, ही बाब देशाच्या वाढत्या क्षमतेचे द्योतक आहे. विशेषतः कृषी क्षेत्रातील AI आणि महाराष्ट्राने साधलेल्या यशावर केंद्रित सत्राला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. जग सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभे असल्याचे त्यांनी नमूद केले. हवामानातील वाढती अनिश्चितता, घटत चाललेली भूजल पातळी, मातीची खालावत चाललेली सुपीकता, कमकुवत होत चाललेल्या पुरवठा साखळ्या आणि अनियमित बाजारपेठ या कारणांमुळे जागतिक अन्न प्रणालींवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः ग्लोबल साऊथमधील देशांसाठी शेती ही केवळ आर्थिक क्रिया नसून उपजीविका, सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा आधारस्तंभ आहे, असे ते म्हणाले. भारताने तंत्रज्ञानावर आधारित सर्वसमावेशक विकासाची दिशा स्वीकारली असल्याचे सांगताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. ‘इंडिया AI मिशन’चा उद्देश तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि मोठ्या प्रमाणावर परिणाम साधणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र या ध्येयपूर्तीत कृषी क्षेत्राला मध्यवर्ती स्थान देणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी ठामपणे मांडले. भारतातील अर्ध्या अब्जाहून अधिक लोकांचा थेट किंवा अप्रत्यक्ष उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. तरीही लहान भूधारकांना तुटपुंज्या माहितीचा आधार, वाढते इनपुट खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि कर्ज व बाजारपेठेपर्यंत मर्यादित पोहोच अशा अडचणींना सामोरे जावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या AI आधारित उपक्रमांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, पारंपरिक कृषी विस्तार व्यवस्था समर्पित असली तरी आजच्या गरजेनुसार तिची गती आणि व्याप्ती अपुरी पडते. AI ही परिस्थिती बदलू शकते, असे ते म्हणाले. AIच्या साहाय्याने अतिसूक्ष्म स्तरावरील हवामान अंदाज, कीड प्रादुर्भावाबाबत आगाऊ सूचना, अचूक सिंचन आणि खत सल्ला, पीकआधारित कर्ज मूल्यमापन, पारदर्शक पुरवठा साखळी आणि तत्काळ बाजार मार्गदर्शन शक्य होते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो आणि जोखीम कमी होते, असे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, केवळ तंत्रज्ञानावर विसंबून चालणार नाही, याची जाणीव करून देताना फडणवीस म्हणाले की AIचा पाया विश्वासार्ह डेटावर आणि नैतिक प्रशासनावर असला पाहिजे. पंतप्रधानांच्या उद्घाटनपर भाषणातील विचार उद्धृत करत त्यांनी सांगितले की, विश्वास, नैतिक शासन आणि सार्वजनिक जबाबदारीशिवाय AIचा विस्तार शक्य नाही. जर लोकांचा विश्वास मिळाला नाही, तर कितीही प्रगत तंत्रज्ञान असले तरी ते मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जाणार नाही, असे त्यांनी अधोरेखित केले. शेतकरी AI स्वीकारण्यास तयार राज्य सरकारने विकसित केलेल्या AI-सक्षम मोबाईल प्लॅटफॉर्मचा उल्लेख करताना त्यांनी त्याला शेतकऱ्यांसाठी डिजिटल मित्र असे संबोधले. हा प्लॅटफॉर्म बहुभाषिक असून प्रत्येक शेतकऱ्याच्या गरजेनुसार वैयक्तिक सल्ला, बाजार माहिती आणि शासकीय योजनांपर्यंत सुलभ प्रवेश उपलब्ध करून देतो. AI शेतकऱ्यांसाठी डिझाइन केले गेले तर शेतकरी ते स्वीकारण्यास तयार आहेत, असे ते म्हणाले. कापूस उत्पादकांसाठी भू-स्थानिक विश्लेषण आणि नंतरच्या देखरेखीच्या यंत्रणेद्वारे तयार करण्यात आलेल्या पूर्वसूचना प्रणालीचा उल्लेख करत त्यांनी त्याला प्रेडिक्टिव्ह गव्हर्नन्स इन अॅक्शन असे वर्णन केले. राज्यसभेत सातपैकी सहा उमेदवार महायुतीचे राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, आज एवढंच सांगेन की आमचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे सातपैकी सहा उमेदवार निवडून येणं पक्कं आहे. महायुतीकडे आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा त्यांनी केला. उर्वरित एक जागा विरोधकांच्या महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. ती जागा कोणी घ्यायची हे त्यांनी ठरवायचं आहे, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना अधिक उधाण आले आहे. AI फॉर ॲग्रीकल्चर – आधुनिक शेतीचा नवा अध्याय! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ येथे ‘AI फॉर ॲग्रीकल्चर: स्केलिंग इंटेलिजेंस फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स’ या विषयावर संबोधन केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, जगभरातील अन्नसाखळीवर वाढता ताण, हवामान बदलाचे गंभीर परिणाम, पाण्याची कमी होत असलेली पातळी आणि मातीच्या गुणवत्तेतील हानी या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका निर्णायक आहे. अनेक देशांसाठी शेती ही केवळ अर्थकारण नाही, तर सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा आधार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने डिजिटल पायाभूत सुविधा आणि जबाबदार AI ला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महा कृषी AI धोरण (2025-29)’ची माहिती दिली. AI आधारित मोबाईल प्लॅटफॉर्मद्वारे स्थानिक हवामानाचा अंदाज, कीटक नियंत्रण, सिंचन-खत व्यवस्थापन, बाजारभाव माहिती आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन दिले जात आहे. जिओस्पेशल एनालिटिक्सच्या माध्यमातून कापसावरील अळीचा वेळेपूर्वी इशारा देऊन नुकसान कमी करण्यात यश मिळाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. राज्यात ‘Agriculture Data Exchange’ विकसित होत असून डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात आहे. यामुळे अन्नसुरक्षा, निर्यात आणि ग्राहकांचा विश्वास बळकट होणार आहे. 150 लाख हेक्टर शेतीक्षेत्र, अग्रगण्य कृषी विद्यापीठे आणि सक्षम स्टार्टअप परिसंस्था असलेल्या महाराष्ट्रात AI आधारित कृषी परिवर्तनासाठी मोठी क्षमता आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अन्नसुरक्षा, हवामान सक्षमता, महिला सक्षमीकरण आणि सामायिक समृद्धीसाठी AI निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र शासन केंद्र सरकार, जागतिक संस्था, संशोधक, गुंतवणूकदार आणि शेतकरी संघटनांसोबत सहकार्याने या परिवर्तनाला गती देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या (MSSRF) अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष जोहॅन्स झुट, एकस्टेप फाउंडेशनचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मरुवाडा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.