वर्दळीचा रस्ता तुटल्याने धोकादायक स्थिती
जानुगडेवाडीनजीकचा प्रकार; वाहनचालकांना येईना अंदाज
ढेबेवाडी, ता. २० : येथून सणबूरकडे जाणारा वर्दळीचा रस्ता कदमआवाड ते जानुगडेवाडी दरम्यान एका बाजूला तुटला आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाजही येत नसल्याने अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने तिथे आवश्यक दुरुस्त्या हाती घेऊन संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांतून होत आहे.
ढेबेवाडी-सणबूर मार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. श्री क्षेत्र नाईकबा देवस्थान, तसेच महिंद-सळवे खोऱ्यासह वाल्मीक पठारावरील अनेक दुर्गम गावाकडे जाणाऱ्या उपरस्त्याना जोडणारा हा मार्ग आहे. मात्र, जानुगडेवाडी ते कदमआवाड दरम्यान रस्त्याची स्थिती अपघाताला निमंत्रण देणारी झाली आहे. शेतमाल व ऊस वाहतुकीसाठी शेतरस्ता तयार करून तो ढेबेवाडी – सणबूर मार्गाला जोडताना काळजी न घेतल्याने रस्ते जोडलेल्या ठिकाणी मोठी चर पडली आहे. त्या ठिकाणी डांबरी रस्ता तुटल्याने वाहनचालकांना धोकादायक स्थितीचा अंदाज येत नाही. श्री क्षेत्र नाईकबा देवाची यात्रा जवळ आली आहे. रस्त्याची दुरुस्ती वेळेत न झाल्यास दुर्घटनेची भीती आहे. रस्ता तुटलेल्या जागी मुरूम टाकून तात्पुरत्या दुरुस्त्या केल्या जात असल्याचा जुना अनुभव असल्याने दुरुस्ती पावसाळ्यात टिकण्यासाठी खडी व डांबराचा वापर करावा, अशी मागणी होत आहे.
———–
(कोट)
————
वर्दळीचा रस्ता अशा ठिकाणी तुटला आहे, जिथे वळणामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाजच येत नाही. त्यामुळे अपघाताची भीती अधिकच वाढली आहे. तातडीने दुरुस्ती न केल्यास दुर्घटना घडू शकते.
– सचिन जानुगडे,
उपसरपंच, जानुगडेवाडी
B08136
कदमआवाड- जानुगडेवाडी : वर्दळीच्या रस्त्याची शेतरस्ता जोडलेल्या ठिकाणी झालेली धोकादायक स्थिती.
——————–