
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी सातत्याने प्रश्न उपस्थित करत विमान कंपनी ‘व्हीएसआर’ आणि अजित पवार गटातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रोहित पवारांच्या या भूमिकेला तपासाची मागणी म्हणून काहींनी पाठिंबा दिला असला तरी, त्यांच्यावर या संवेदनशील घटनेचे राजकारण केल्याची टीकाही विरोधकांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला असून, त्यांनी रोहित पवारांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही या वादात ओढत अनेक टोकदार सवाल उपस्थित केले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना स्पष्ट केले की, अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताचे राजकारण करून जनतेचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न क्लेशदायक आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री सक्षम असून त्यांनी आधीच चौकशीचे आदेश दिले आहेत, तसेच कुटुंबाने केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीवरही शासन गांभीर्याने विचार करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अपघाताचे सत्य समोर येणे हा कुटुंब आणि जनतेचा अधिकार असला तरी, या दु:खद घटनेचे माध्यमांसमोर अशा प्रकारे भांडवल करणे चुकीचे असल्याचे म्हणत विखे पाटलांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा निशाणा साधला. दादांना मुख्यमंत्रीपदाची संधी कोणी नाकारली राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अजित पवार जेव्हा हयात होते, तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत कसे वागला? हे लोकांना माहित नाही का? तुम्ही आणि काका (शरद पवार) कसे वागले? अजित पवारांना तुम्ही कधी सन्मान मिळू दिला का? असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, कॉंग्रेसच्या काळात राष्ट्रवादीच्या जागा येऊन देखील त्यावेळी अजित दादांना मुख्यमंत्रीपदाची संधी कोणी नाकारली. अपघाताचे भांडवल करण्यापेक्षा अगोदर याचे उत्तर महाराष्ट्राला द्या, असे आव्हान विखे पाटील यांनी रोहित पवारांना केले आहे. तसेच अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची जेव्हा संधी होती तेव्हा ती का मिळू दिली नाही? याचे उत्तर राज्यातील जनतेला मिळावे ही माझी अपेक्षा आहे, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यासह शरद पवारांवरही निशाणा साधला आहे.