तळेगाव दाभाडे, ता १९ : कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच रूपेश अरुण गायकवाड यांनी २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कार्यकाळात सुमारे २५ कोटी रुपयांच्या विकासकामांचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत सादर केला. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित परिषदेत त्यांनी विविध महत्त्वाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
येत्या २४ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने सरपंच रूपेश गायकवाड यांनी आढावा मांडला. या पत्रकार परिषदेला माजी उपसरपंच नीलेश दाभाडे, दत्तात्रेय शिंदे तसेच सदस्य परेश बरदाडे उपस्थित होते. गायकवाड यांनी ग्रामस्थांनी पाच वर्षे काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, त्या निधीतून पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
कामशेत शहरातील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे, महिलांसाठी सांस्कृतिक भवन उभारणी, नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम, निवाराशेड उभारणी आणि पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा अशी अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या विकासकामांमुळे गावाच्या प्रगतीला गती मिळाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या पाच वर्षांत नकळत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यापुढील काळात निवडणूक लढवो अथवा न लढवो, जनतेच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.