
Nandurbar Irrigation News: नंदुरबार : धनपूर (ता.तळोदा) येथील लघु प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. पण प्रकल्पाचे पाणी शेतापर्यंत पोचविण्यासंबंधी पाटचारी, वितरिकांचे काम झालेले नाही. शिवार तहानलेलेच असल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.
धनपूर प्रकल्प किंवा धरणामुळे परिसरातील २७२ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे, मात्र केवळ पाटचारी नसल्यामुळे हे क्षेत्र अद्यापही तहानलेलेच राहिले आहे. बोरद (ता.तळोदा) व परिसरातील २० ते २५ गावांतील शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होणार होवू शकतो.
सध्या काही गावांना या धरणाचा लाभ होताना दिसून येत आहे. १ जुलै १९९७ ला नंदुरबार जिल्हानिर्मितीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाटबंधारेमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे स्वर्गीय पी. के.अण्णा पाटील यांनी धरपूर धरणाचा प्रस्ताव मांडला होता. पी.के.अण्णा यांनी या विषयाला चालना दिली होती. जून २०१७ पासून या धरणात पाणी साठविण्यास सुरवात झाली. हे धरण पूर्ण झाल्याने बोरद परिसरातील मोड, मोहिदा, कळमसरा, धनपूर, सिलिंगपूर, खर्डी लाखापूर फॉरेस्ट, न्यूबन, छोटे धनपूर, राणीपूर आदी गावांतील सुमारे २७२ हेक्टर शेतजमीनही ओलिताखाली येईल, असे सांगण्यात आले. पण कार्यवाही झाली नाही. शिवार हिरवे होईल, शेतकरी सुखी आणि समाधानी होईल, उत्पादनात वाढ होईल, अशी आश्वासने अनेकदा मिळाली. परंतु शेतापर्यंत पाणी पोचलेच नाही. हा परिसर आदिवासी बांधव बहुल आहे.
कूपनलिकांना लाभ
धरणाची लांबी सुमारे ४२२ मीटर असून, उंची २०.१८ मीटर, तर खोली १६० मीटर आहे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर पाणी निझरा नदीत सोडण्यात येते. या धरणामुळे परिसरातील कूपनलिकांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. पण कूपनलिकाधारक शेतकरी कमी आहेत.
निधी मंजूर
पाटचारीसाठी मध्यंतरी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पण पाटचाऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पाणी शेतापर्यंत जात नाही. आता बंदीस्त जलवाहिनीतून पाणी शेतात पोचविण्याचा मुद्दाही उपस्थित होत आहे. कारण पाटचारीत भूसंपादन व अन्य समस्या असतात. शेतकऱ्यांचेही नुकसान होते.