उपमुख्यमंत्री कोण, राष्ट्रीय अध्यक्ष कोण, हेही ठरले असेल:रोहित पवारांच्या दाव्यावर भुजबळांचा टोला; पदवाटप ठरल्यावरुन खिल्ली

उपमुख्यमंत्री कोण, राष्ट्रीय अध्यक्ष कोण, हेही ठरले असेल:रोहित पवारांच्या दाव्यावर भुजबळांचा टोला; पदवाटप ठरल्यावरुन खिल्ली
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास संघटनेत मोठे बदल होतील, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यांच्या मते, दिवंगत नेते अजित पवार यांना नेतृत्वात फेरबदल करायचे होते आणि प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा द्यायचा होता. त्यासाठी अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा झाली होती. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता या दाव्यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवार यांच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, रोहित पवार सांगत आहेत की अजितदादांनी त्यांच्या सोबत काही ठरवलं होतं. मात्र आम्हाला तसं काहीही सांगितलेलं नव्हतं. अशा प्रकारचे कोणतेही निर्णय आमच्या माहितीमध्ये नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात अधिकृतपणे काही ठरलेले नसताना अशा दाव्यांवर काय बोलायचे, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला. भुजबळ यांनी पुढे सांगितले की, सध्या पक्षाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हातात आहे. त्यांना पूर्ण सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. नवीन नेतृत्व काय निर्णय घेते, त्यानुसार पुढील भूमिका ठरेल. आमच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई आहेत, त्यांच्याशी बोलावे, असे सांगत त्यांनी विषय अधिक न वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उपहासात्मक शैलीत आणखी एक टिप्पणी केली. विलीनीकरण अजून झालेलेच नाही, आणि त्याआधीच कोण कोणत्या पदावर बसणार हे ठरवून टाकले गेले, असे जर कोणी सांगत असेल तर त्यावर आपण काय प्रतिक्रिया द्यायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री कोण होणार, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, हेही ठरले असेल कदाचित, असे म्हणत त्यांनी रोहित पवार यांच्या दाव्याला थोड्याशा टोमण्यांच्या सुरात उत्तर दिले. दरम्यान, बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. मात्र अजितदादा आता हयात नसल्याने या विषयावर सविस्तर बोलणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले. तरीही, जर विलिनीकरण झाले असते तर नेतृत्वात बदल झाले असते, असे ते म्हणाले. प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा हवा, ही अजितदादांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने अमोल कोल्हे यांचे नाव पुढे आले होते, असा त्यांचा दावा होता. राजकीय नव्हे तर भावनिक इच्छा रोहित पवार यांनी असेही सांगितले की, अमोल कोल्हे अनेक बैठकींमध्ये सहभागी होत होते. त्या चर्चांमध्ये नेतृत्व बदल आणि संघटनात्मक रचना यावर विचारविनिमय झाला. अजितदादांची ही केवळ राजकीय नव्हे तर भावनिक इच्छा होती. दोन्ही पक्ष एकत्र यावेत आणि कुटुंब पुन्हा एकत्र यावे, असे त्यांना वाटत होते. संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून अमोल कोल्हे यांची नियुक्ती व्हावी, अशी त्यांची भूमिका होती, असे रोहित पवार यांनी नमूद केले. पक्षातील मतभेद उघडपणे समोर याच संदर्भात त्यांनी आणखी एक उल्लेख केला. या विषयावर एकूण 13 बैठका झाल्या होत्या आणि त्या बैठका जयंत पाटील यांच्या घराजवळ झाल्याचे त्यांनी सांगितले. त्या परिसरातील चित्रफितीत अजितदादा येताना दिसतील, असा दावाही त्यांनी केला. या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. एका बाजूला रोहित पवार यांचे दावे आणि दुसऱ्या बाजूला भुजबळ यांची उपरोधिक प्रतिक्रिया यामुळे पक्षातील मतभेद उघडपणे समोर येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart