शिंदेंचं नंदनवन बेईमानीतून निर्माण झालेले:राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया; म्हणाले- प्रवृत्तीवरून आमचे टोकाचे मतभेद

शिंदेंचं नंदनवन बेईमानीतून निर्माण झालेले:राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया; म्हणाले- प्रवृत्तीवरून आमचे टोकाचे मतभेद
मनसेप्रमुख ठाकरे यांनी ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर प्रथमच हे दोन्ही नेते समोरासमोर आले. या भेटीमुळे विविध राजकीय शक्यतांना उधाण आले असून सत्ताधारी आणि विरोधकांच्या वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. नंदनवन बंगल्यावर झालेल्या या चर्चेला विशेष महत्त्व दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारल्यावर राऊत म्हणाले, हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंनाच विचारा. आम्ही कुणाची हेरगिरी करत नाही. कोण कुणाला भेटतो यावर बंधने नाहीत. मात्र याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे यांच्या प्रवृत्तीवरून आमचे टोकाचे मतभेद आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. राऊत यांनी पुढे आरोप करताना सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. या सगळ्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विचार असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिंदेंचं हे नंदनवन बेईमानीतून निर्माण झालं आहे, असा तीव्र शब्दप्रहार राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. दरम्यान, 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी विविध विषयांवर संवाद झाल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील अलीकडील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर बदललेली राजकीय समीकरणे या चर्चेच्या केंद्रस्थानी होती, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या भेटीकडे केवळ औपचारिक शिष्टाचार म्हणून पाहिले जात नाही. विशेषतः कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. या निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. त्यावर राज ठाकरे यांनीही महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहील, असे आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart