
औसा तालुक्यातील करजगाव येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या पूर्वसंध्येला, १७ फेब्रुवारी रोजी सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. यावेळी त्यांनी उपस्थित हजारो भाविकांना आणि वारकऱ्यांना गुरुपरंपरेचे नियम पाळण्याबाबत अत्यंत ठाम व सुस्पष्ट संदेश दिला. गुरुपरंपरेचे चक्रीभजन, नित्यनेम आणि एकादशी वारी हे आचरणात आणल्याशिवाय गुरुगादीचा उपदेश व अनुग्रह घेऊ नये, अशा शब्दांत त्यांनी भाविकांची कानउघाडणी केली. संत तुकाराम महाराजांच्या मागणं ते एक तुझं प्रति आहे… या अभंगावर निरूपण करताना त्यांनी देवाकडे काय मागावे, याचे भान असणे आवश्यक असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचनातूनच जीवनाला योग्य दिशा मिळते, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला की, ज्या गावातून माघवारीच्या पालखी सोहळ्यात किमान दहा टाळकरी सहभागी होतील, अशाच गावात यापुढे कीर्तन सेवा दिली जाईल. या सोहळ्याला परिसरातील शेकडो टाळकरी आणि हजारो वारकरी उपस्थित होते. तत्पूर्वी, निष्ठावंत गुरुभक्त रामभाऊ काळे यांच्या निवासस्थानी गुरुबाबांचे भव्य स्वागत व पाद्यपूजा करण्यात आली. नसत्याच्या मागे धावू नका. गाथेचे चिंतन करा “मनाला पांगुळ करणाऱ्या आणि स्वैर करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. नसत्याच्या मागे धावू नका. बुद्धी सक्षम, सतेज आणि शुद्ध करायची असेल तर ज्ञानेश्वरी गाथेचे चिंतन करा,” असा उपदेश करत गुरुबाबांनी संतसाहित्याच्या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. हसत-खेळत ज्ञानेश्वरी वाचता येते, परंतु त्यासाठी नियमितता आणि श्रद्धा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.