
निवडणूक आली की इंडिया आघाडी वळवळ करते जिवंत आहे हे दाखवते, असे दाखवून चालणार नाही, राष्ट्रीय प्रश्नांवर आतापासूनच एकत्रित लढा देणे आवश्यक आहे, राहुल गांधींच्या नेतृत्वाची धास्ती सत्ताधाऱ्यांनी घेतली असली, तरी आघाडी अधिक मजबूत होणे काळाची गरज आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या सद्यस्थितीवर आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची गरज असल्याचे मी स्वतः म्हटलेले नाही, तर काँग्रेसमधीलच अनेक नेत्यांचा हा ‘अंतरात्मा’ आहे. मणिशंकर अय्यर आणि संजय बारू यांच्यासारख्या व्यक्तींच्या भूमिकांचा दाखला देत राऊत म्हणाले की, बिहारमधील निकाल निराशाजनक आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाची धास्ती सत्ताधाऱ्यांनी घेतली असली, तरी आघाडी अधिक मजबूत होणे काळाची गरज आहे. केवळ निवडणुकीपुरते काम करु नये संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस हा आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असून त्यांचे 100 च्या आसपास खासदार आहेत. त्यामुळे देशाचे नेतृत्व करण्याची आणि आघाडीला दिशा देण्याची मोठी जबाबदारी काँग्रेसवर आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की: भविष्यात काँग्रेसचा नेता पंतप्रधान व्हावा, ही आमची भूमिका आहे; पण त्यासाठी आतापासूनच जमिनीवर काम करावे लागेल. केवळ निवडणुकीच्या काळात हालचाली करून फायदा होणार नाही.शेतकरी, कष्टकरी आणि मणिपूरसारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर इंडिया आघाडीने सामूहिक भूमिका मांडणे आवश्यक होते, जे अद्याप प्रभावीपणे घडताना दिसत नाही. आम्ही चळवळीतील माणसे आहोत, घरात बसून राहणे आम्हाला मान्य नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारला जाब विचारणे आमचा अधिकार आहे, असेही ते ठामपणे म्हणाले. ..तर मनपाचे आकडे वेगळे असते मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, जर महाविकास आघाडी (मविआ) एकत्र लढली असती, तर आज दिसणारे आकडे वेगळे असते. काँग्रेसची कामगिरी वाईट नाही, पण विखुरलेल्या मतांमुळे भाजपला सत्तेत येण्याची संधी मिळाली. हीच भावना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीही असल्याचे त्यांनी नमूद केले. रोहित पवारांची भेट काल सत्र न्यायालयात रोहित पवार आणि आपली अचानक भेट झाल्याचे संजय राऊतांनी सांगितले. यावेळी अजित पवार यांच्या अपघाता संदर्भातील काही बाबी आणि राज्यातील इतर राजकीय घडामोडींवर चर्चा झाली.