चंद्रपूरचा बदला आम्ही परभणीत घेतला नाही:उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा थेट राजकीय इशारा; दोन्ही पक्षांतील संबंधांवर प्रश्नचिन्ह

चंद्रपूरचा बदला आम्ही परभणीत घेतला नाही:उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा थेट राजकीय इशारा; दोन्ही पक्षांतील संबंधांवर प्रश्नचिन्ह
चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापनेच्या घडामोडींवरून काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याचा उल्लेख करत, चंद्रपूरचा बदला आम्ही परभणीत घेतला नाही, असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट राजकीय इशारा म्हणून पाहिले जात आहे. महापौर निवडणुकीतील निकालानंतर दोन्ही पक्षांतील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना चेन्नीथलांच्या या सूचक भाष्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांनंतर महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाने प्रभावी कामगिरी केली. मात्र सर्वाधिक चर्चा चंद्रपूर महापालिकेची झाली. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक २७ नगरसेवक निवडून आले होते. तरीही सत्तास्थापनेत काँग्रेसला अपयश आले. भाजपाने शिवसेना ठाकरे गटाच्या पाठिंब्याने महापौरपद मिळवत सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून मित्रपक्षांमधील तणाव उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. चंद्रपूर महापालिकेतील घडामोडींवर झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आमच्याकडे 27 नगरसेवकांचे संख्याबळ होते, मात्र बहुमत नव्हते. तरीही आम्ही चांगले यश मिळवले होते. पण शिवसेना (ठाकरे) गटाच्या आठ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने आम्हाला महापौर निवडणुकीत अपयश आले, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी चंद्रपूरचा बदला आम्ही परभणीत घेतला नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना संदेश दिल्याची चर्चा रंगली आहे. चंद्रपूरमध्ये नेमके काय घडले, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला. 66 सदस्यीय सभागृहात काँग्रेस 27 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती. भाजपाने 23 जागा जिंकल्या, तर ठाकरे गटाला सहा जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष प्रत्येकी दोन जागा, तर शिंदेसेना, बसपा आणि एमआयएम प्रत्येकी एक जागा जिंकून सभागृहात पोहोचले. स्पष्ट बहुमत कोणालाही नसल्याने सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांचा पाठिंबा निर्णायक ठरणार हे स्पष्ट झाले होते. बहुमतासाठी भाजपाला 11 नगरसेवकांची गरज होती, तर काँग्रेसला फक्त सात नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौर कोण होणार याबाबत तीव्र राजकीय हालचाली सुरू झाल्या. अखेर भाजप आणि ठाकरे गटामध्ये सव्वा-सव्वा वर्ष महापौरपद वाटून घेण्याचा लेखी करार झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार भाजपच्या संगीता खांडेकर यांची अवघ्या एका मताने महापौरपदी निवड झाली. तर उपमहापौरपदी ठाकरे गटाचे प्रशांत दानव ईश्वर चिठ्ठीने विजयी झाले. या निकालामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून दूर राहावे लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. स्थानिक पातळीवर खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेमुळे पराभव ओढवला, अशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे संभाव्य मित्रपक्ष दुरावले का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परभणीमध्ये चंद्रपूरप्रमाणे प्रतिउत्तर देण्याचा मार्ग दरम्यान, परभणीतील परिस्थितीचा उल्लेख करत चेन्नीथला यांनी स्पष्ट केले की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने तेथे शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा दिला. म्हणजेच चंद्रपूरप्रमाणे प्रतिउत्तर देण्याचा मार्ग त्यांनी अवलंबला नाही, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे काँग्रेसकडून संयम दाखवला गेला, असा संदेश त्यांनी दिला आहे. चंद्रपूरमधील या सत्तानाट्यामुळे राज्यातील आघाड्यांच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांतील विश्वासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापौर निवडणुकीतील या उलटफेरीने काँग्रेसला धक्का दिला असला, तरी पुढील राजकीय वाटचालीत पक्ष कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart