
खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील प्रगतिशील शेतकरी दिपक पाढुरंग चव्हाण यांनी या सुधारित टोमॅटो जातीची लागवड करून विक्रमी उत्पादन घेत तालुक्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. देवळाणा शिवारातील गट क्रमांक ४१ मध्ये सुमारे ८ एकर क्षेत्रावर घेतलेल्या या पिकातून आतापर्यंत तब्बल २५० टन (अडीच हजार क्विंटल) उत्पादनाची विक्री झाली असून उर्वरित पिकातून आणखी सुमारे १५० टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे एकूण उत्पादन ४०० टनांच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रोगनियंत्रण आणि हवामानाचा अभ्यास हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि कीडरोगांचा धोका लक्षात घेऊन वेळेवर फवारणी व तज्ज्ञांचा सल्ला घेतला गेला. ठिबकद्वारे द्रवरूप खतांचा वापर (फर्टिगेशन) केल्याने पिकाची वाढ संतुलित राहिली. त्यामुळे फळधारणा चांगली झाली आणि गुणवत्ताही टिकून राहिली. ८ एकरांत नियोजनबद्ध लागवड चव्हाण यांनी ऑक्टोबर महिन्यात विरांग जातीची रोपे लावली. जमिनीची पूर्वतयारी, सेंद्रिय खतांचा वापर, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन आणि ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब यामुळे पिकाची वाढ जोमदार झाली. प्रत्येक एकरातून सरासरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळत असल्याने एकूण उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. स्थानिकांना रोजगाराची संधी टोमॅटो काढणी, वर्गीकरण, पॅकिंग व लोडिंग यासाठी स्थानिक मजुरांना काम मिळाले. हंगामात दररोज २० ते २५ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे गावपातळीवर आर्थिक हालचाल वाढली असून शेतीपूरक व्यवसायांनाही चालना मिळाली आहे. १० हजार क्रेटची थेट विक्री टोमॅटोची टिकाऊपणा, आकर्षक रंग आणि बाजारपेठेत मागणी लक्षात घेता मुंबई व गुजरातमधील व्यापाऱ्यांनी थेट शेतातून खरेदी केली. आतापर्यंत सुमारे १० हजार कॅरेट टोमॅटोची विक्री झाली आहे. शेतातून थेट माल उचलला जात असल्याने वाहतूक खर्च आणि दलालांची साखळी टळली, परिणामी शेतकऱ्याला चांगला दर मिळाला.