
छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून दुचाकी आणि चारचाकी वाहने उचलून वाहनधारकांना मानसिक त्रास देणाऱ्या “ॲक्टिव्ह मोटर्स” या खाजगी एजन्सीची मुजोरी थांबली आहे. “दिव्य मराठी” ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. या एजन्सीने महानगरपालिकेला पत्र देऊन तीन दिवसांपासून आपले काम थांबवले आहे. यामुळे शहरातील हजारो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जानेवारीपासून १२ फेब्रुवारीपर्यंत १०६५ चारचाकी तर २३०२ दुचाकीस्वारांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. शहरात अधिकृत पार्किंगची व्यवस्था नसतानाही केवळ ठराविक रस्त्यांवरून वाहने उचलणे, गाडी उचलताना होणारी मोडतोड आणि ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची अरेरावी यावर “दिव्य मराठी” ने प्रकाश टाकला होता. “नागरी मित्र पथक” हे मित्र नसून वसुलीचे साधन बनल्याचे समोर आणल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमधून मोठा जनक्षोभ उसळला होता. वाहनधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने एजन्सीचे कर्मचारी त्रस्त झाले. परिणामी त्यांनी काम थांबवण्याबाबत मनपाला पत्र दिले. यामध्ये मनपाकडे जमा होणारे ऑनलाइन पेमेंटदेखील वेळेवर मिळत नसल्याचा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. ५०० दुचाकी, हातगाडी १००० चारचाकी जॅमर लावणे २००० चारचाकी टो करणे अशी आहे दंडाची रक्कम चारचाकी उचलण्यासाठी आता झोननिहाय आदेश शहरातील विशिष्ट भागातून चारचाकी उचलण्याबाबत दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी बैठक घेऊन प्रत्येक झोनमध्ये रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या चारचाकीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार आता सर्व भागांत मनपाच्या टोइंग व्हॅन फिरून कारवाई करत आहेत. “पे अँड पार्क’ केल्यानंतरच सुरू करावे गाड्या उचलणे केवळ दंड वसूल करणे हा उद्देश न ठेवता, शहरात आधी “पे अँड पार्क” किंवा मोफत पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. जोपर्यंत मनपा नवीन पार्किंग धोरण स्पष्ट करत नाही आणि अधिकृत पार्किंग झोन जाहीर करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारची वसुली बंदच ठेवावी, असा नागरिकांचा आग्रह आहे.