छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीवर अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे मधमाशांच्या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळ आणि धावपळ उडाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणुकीची तयारी सुरू असताना परिसरातील झाडावर असलेले मधमाशांचे पोळे हलले. पोळे हलताच मधमाशा आक्रमक झाल्या आणि जवळ उभ्या असलेल्या काही प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांवर त्यांनी हल्ला केला.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक मधमाशांपासून बचाव करण्यासाठी पळत सुटले. या घटनेत अनेक जण किरकोळ जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धूर (स्मोक बॉम्ब) सोडण्यात आला. मात्र धुरामुळे मधमाशा अधिकच पसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेच्या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख हे देखील उपस्थित होते. त्यांनी आणि इतरांनी वेळेत सुरक्षित ठिकाणी जाऊन स्वतःचा बचाव केला. नंतर परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर पुन्हा उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.