
प्रतिनिधी | अकोला रालतो विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) पथकाच्या वतीने विशेष सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन झाले. निवासी शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये रुजणारे श्रमसंस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव व नेतृत्वगुण यांचे महत्त्व अध्यक्ष दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता यांनी विशद केले. शिबिरातून मिळणारे संस्कार दैनंदिन जीवनातही अंगीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले. उद्घाटन डॉ. सत्यनारायण बाहेती यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. चंद्रवंशील, डॉ. सुधीर कोहचाळे, आपोती बु.चे सरपंच वैभव तराळे, तुळशीराम तराळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण करून करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ. शैलेश जयस्वाल यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. कविता हेडा यांनी मानले. या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती अभियान, श्रमदान, योगासने व प्राणायाम, आपत्ती व्यवस्थापन, वृक्षारोपण, प्रबोधनपर व्याख्यान यासारख्या उपक्रमासह व विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे गटप्रमुख हर्ष येलकर व दिशा चांडक यांच्यासह मोठ्या संख्येने स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्राम विकासासाठी कार्य करा प्रास्ताविकामध्ये डॉ. कोहचाळे यांनी संतांच्या विचारांचा शिबिरातील कार्याशी असलेला संबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांना समाजाभिमुख कार्यासाठी प्रेरित केले. स्वागतपर मनोगतात प्राचार्य डॉ. चंद्रवंशी ग्रामस्थांसाठी उत्कृष्ट व परिणामकारक कार्य करण्याचे आवाहन केले. डॉ. बाहेती यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व अधोरेखित करत, व्यक्तिमत्व विकास व सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता स्पष्ट केली.