
राज्यसभेच्या एका जागेसाठी आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ आहे आणि त्या जागेवर कोणाला संधी द्यायची याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून घेतील, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मांडली. ते सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले की, राज्यसभेच्या जागेबाबत कोणताही घाईगडबडीचा निर्णय होणार नाही. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर एकमताने उमेदवार निश्चित केला जाईल. आमच्याकडे संख्याबळ आहे, त्यामुळे जागा जिंकण्याची ताकद आहे. मात्र, प्रतिनिधीत्व कोण करणार हे तिन्ही पक्षांच्या सामंजस्यातून ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीत प्रत्येक पक्षाला संधी मिळावी अशी अपेक्षा असते, हेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना सर्वांच्या भावना आणि राजकीय समीकरणांचा विचार केला जाईल, असे राऊत म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतल्या चर्चांना आता वेग येण्याची शक्यता आहे. या आधी संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांचे नाव घेत त्यांना आघाडीच्या वतीने राज्यसभेसाठी पाठवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आता राऊत यांनी सावध भूमिका घेत एकमताने निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…