वडापुरी, ता. १९ : इंदापूर तालुक्यात आठ दिवसांपासून थंडी कमी होत चालली आहे. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने दिवसा चांगलेच उन वाढले आहे. या उन्हापासून बचाव होण्यासाठी कलिंगड टरबुजासह विविध प्रकारची फळे, शीतपेये खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
उन्हाच्या झळा वाढल्यामुळे इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील चौकाचौकात फळाचे आणि ज्यूसचे स्टॉल लागल्याचे पहावयास मिळत आहे.
उन्हाचा पारा वाढू लागल्याने फळांच्या किमतीतही वाढ होत आहे. कलिंगड, संत्री, द्राक्ष, पपई, केळी, अननस अशी फळे घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढला असून, विविध प्रकारची कोल्ड्रिंक्स, उसाचा रस, फळांचे ज्यूस, ताक, दही, काकडी, गाजर, बीट अशा थंडावा देणाऱ्या वस्तूंना नागरिक प्राधान्य देत आहेत.
वडापुरी येथील फळ विक्रेते फिरोज शेख म्हणाले, ‘‘उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक दररोज फळांची खरेदी करत आहेत, त्यामुळे फळांची विक्री चांगली होत आहे. जरी फळांचे भाव वाढले असले तरी नागरिक उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून फळे घरी घेऊन जात आहेत.’’ शेटफळ हवेली, वडापुरी, रामवाडी, लाकेवाडी, हिंगणगाव बाबुळगाव, अवसरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळाचे व ज्यूसचे स्टॉल लागले आहेत.