महापालिका निवडणुकांच्या निकालाला महिना उलटला.. मात्र भिवंडीच्या महापौरपदाचा तिढा सुटता सुटत नाहीये.. मात्र आता भिवंडीत भाजपमध्येच उभी फूट पडलीय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय..कारण ऐन महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं भाजपच्या नारायण चौधरींसह 9 नगरसेवकांना गळाला लावून भाजपला धक्का दिलाय….. मात्र फुटून जाणारा भाजपचा नसतो, अशा शब्दात मंत्री आशिष शेलारांनी संताप व्यक्त केलाय…
खरं तर भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेस 30 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला.. तर पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक निवडून आले होते… मात्र समाजवादी पक्षानं काँग्रेससोबत न जाण्याचा निर्णय घेतला… त्यामुळे 46 हा बहुमताचा आकडा गाठण्याचं आव्हान काँग्रेससमोर निर्माण झालं होतं… त्याच दरम्यान 22 जागा असलेल्या भाजपनंही सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या… तर 12 जागा असलेल्या शिंदेसेनेनं भिवंडी विकास आघाडीचे 3 आणि कोणार्क आघाडीचे 4 नगरसेवक सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु केले होते…
यात विशेष गोष्ट म्हणजे नारायण चौधरींची महापौरपदासाठी उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच स्नेहा पाटील यांना महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली… आणि तिथंच ठिणगी पडली….
स्नेहा पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर नारायण चौधरींनी आधी शिंदेंची तर त्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची भेट घेत सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय.. मात्र यामागे भाजपचीच छुपी खेळी आहे का? असा सवाल उपस्थित होतोय आणि.. त्याचं नेमकं कारण काय आहे…तर
अपेक्षित संख्याबळ नसतानाही भाजपनं महापौरपदासाठी डाव खेळलाय.. भाजपनं स्नेहा पाटील यांना महापौरपदाची उमेदवारी देत नारायण चौधरी नाराज असल्याचं चित्र निर्माण केलं असू शकतं… आता काँग्रेसनं आपला महापौरपदाचा उमेदवार तारीक मोमीन यांना माघार घ्यायला लावल्यास एक प्रकारे नारायण चौधरींच्या रुपाने भाजपचाच महापौर होण्याची शक्यता आहे… कारण नारायण चौधरींनी महापौरपदावर कॉम्प्रमाईज केलं नसल्याचं संकेत हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत…
राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर निवड झाल्यानंतरही भिवंडीला महापौर मिळाला नाही… आता नारायण चौधरी काँग्रेससोबत गेल्यानं काँग्रेसचा महापौरपदाचा उमेदवार माघार घेणार की नारायण चौधरींच्या माध्यमातून भाजपच महापौरपद पटकावणार…. याचीच उत्सुकता आहे…