
मालमत्तेच्या वाटपाच्या कारणावरून एका ३५ वर्षीय महिलेचा दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उदगीर तालुक्यातील माळेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी बुधवारी (१८ फेब्रुवारी) सायंकाळी उशिरा उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पद्मावती अनुप जाधव (वय ३५, रा. विद्यानिकेतन कॉलनी, माळेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. मयत महिलेचा भाऊ बालाजी बेद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून पद्मावती यांना मालमत्तेच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केली. रक्ताच्या नात्यात वितुष्ट माळेवाडी येथील ही घटना नात्यांमधील वाढती कटुता आणि मालमत्तेच्या हव्यासाचे विदारक दर्शन घडवणारी आहे. केवळ प्रॉपर्टीच्या वाटपावरून एका महिलेचा जीव घेण्यापर्यंत आरोपींची मजल गेली, यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलीस आता या प्रकरणातील सहाही आरोपींचा शोध घेत आहेत. प्रॉपर्टीच्या वाटपासाठी विधवा महिलेचा खून नऊ महिन्यांपूर्वी मयत महिलेचा पती नामे अनुप जाधव यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. मयतास एक मुलगा लहान मुलगा असून सासरच्या मंडळींनी मयतासोबत प्रॉपर्टीच्या वाटपासाठी वाद घातला होता. या वादातूनच सासरच्या मंडळींनी महिलेचा खून केला आहे. – राजकुमार पुजारी, पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस ठाणे उदगीर.