
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्याच्या चर्चा सुरू असतानाच, त्यांचे पुत्र जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. विमान अपघातात ब्लॅक बॉक्स इतक्या सहजासहजी नष्ट होऊ शकत नाहीत, असे तांत्रिक मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी या चर्चांना उत्तर दिले आहे. तसेच, या घटनेचे गांभीर्य ओळखून व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. जय पवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले की, विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही; महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. तसेच व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे, अशी मागणी जय पवार यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघातावर त्यांच्या कुटुंबाकडून प्रथमच जाहीर प्रतिक्रिया आली असून, चिरंजीव जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या घटनेचे पारदर्शक सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्याची आणि विमानांच्या देखभालीतील संभाव्य गंभीर गैरव्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावर जय पवार यांची भूमिका रोहित पवारांच्या मागणीशी सुसंगत असल्याचे पाहायला मिळत असून, कुटुंबियांच्या या जाहीर भूमिकेमुळे आता तपासाची मागणी अधिक जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीकडून सीबीआय चौकशीची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी केली. या महत्त्वपूर्ण भेटीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. या अपघातामागील नेमके सत्य काय आहे, हे समोर येण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केले. अजित पवारांना दिलेल्या विमानात आधीपासूनच बिघाड- रोहित पवार दुसरीकडे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातासंदर्भात आपली तिसरी पत्रकार परिषद घेत व्हीएसआर विमान कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी याप्रकरणी डीजीसीएने दिलेल्या स्पष्टीकरणावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, संबंधित विमान कंपनीचे तेलुगु देसम पार्टीच्या नेत्यांशी संबंध असल्याचा दावा केला आहे. याच कारणास्तव त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच, अजित पवार यांना प्रवासासाठी दिलेले विमान आधीपासूनच इंजिनमध्ये बिघाड असलेले होते, असा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला.