
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रसाद ओक यांनी ऐतिहासिक जागतिक कामगिरी नोंदवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एका मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक पुरस्कार जिंकणारे अभिनेते म्हणून त्यांची अधिकृत नोंद इंग्लंडस्थित Global Book of Excellence या संस्थेने केली आहे. 14 जानेवारी 2026 रोजी हा विक्रम अधिकृतपणे मान्य, नोंदवून आणि नोंदणी करून जाहीर करण्यात आला. एका प्रादेशिक भाषेतील चित्रपटासाठी मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. प्रसाद ओक यांना हा मान त्यांच्या 2022 साली प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या मराठी चित्रपट धर्मवीर मधील प्रभावी अभिनयासाठी मिळाला. या चित्रपटातील त्यांच्या सशक्त भूमिकेसाठी त्यांना 15 प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. एका मराठी चित्रपटासाठी एखाद्या अभिनेत्याने जिंकलेली ही सर्वाधिक पुरस्कारांची संख्या असल्याने हा विक्रम ठरला आहे. त्यांच्या अभिनयाचे समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी एकमुखाने कौतुक केले होते. भारतीय प्रादेशिक चित्रपटसृष्टीत कलात्मक उत्कृष्टतेचा नवा मापदंड त्यांनी या भूमिकेद्वारे निर्माण केला, असे मानले जात आहे. ‘धर्मवीर’मध्ये प्रसाद ओक यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. जनतेसाठी आयुष्य अर्पण करणारे, लोकांमध्ये दैवतासमान स्थान असलेले व्यक्तिमत्त्व पडद्यावर उभे करण्याचे मोठे आव्हान त्यांनी स्वीकारले. त्यांच्या अभिनयातून आनंद दिघे यांचे व्यक्तिमत्त्व, चालण्याची ढब, बोलण्याची शैली आणि जनसंपर्काची ताकद प्रभावीपणे उभी राहिली. हा चित्रपट 2022 मधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला. पुढे आलेल्या त्याच्या उत्तरार्धानेही या चित्रपटाच्या यशाला अधिक बळ दिले. या जागतिक मान्यतेबाबत प्रतिक्रिया देताना प्रसाद ओक म्हणाले, माझ्याकडे शब्द नाहीत. हा अभिमानाचा क्षण आहे. लेखक, दिग्दर्शक, माझं कुटुंब, प्रेक्षक आणि मला पुरस्कार देणाऱ्या सर्व परीक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी सांगितले की, शीर्षक भूमिका साकारण्याची संधी मिळेल असे त्यांनी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते. ‘धर्मवीर’ हा त्यांचा 96 वा चित्रपट होता. हजारो लोक ज्यांना दैवत मानतात अशा व्यक्तीची भूमिका साकारणे ही मोठी जबाबदारी होती आणि ती पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी नमूद केले. आनंद दिघे यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र छायाचित्रे, त्यांच्या निकटवर्तीयांशी संवाद आणि विविध आठवणींमधून त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला. चालणे, बोलणे, हावभाव यांचे बारकाईने निरीक्षण करून सविस्तर नोंदी तयार केल्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद, समीक्षकांची प्रशंसा आणि अभिनंदनाचे असंख्य दूरध्वनी हे सर्व अनुभव अविस्मरणीय होते, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही याची थोडी खंत वाटली, मात्र प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे समाधान मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रसाद ओक यांनी याआधी India Book of Records कडूनही मान्यता मिळाल्याचे सांगितले. ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या दोन्ही मान्यतांना त्यांनी राष्ट्रीय पुरस्काराइतकेच महत्त्व असल्याचे म्हटले. या सन्मानामुळे केवळ त्यांचा वैयक्तिक प्रवास समृद्ध झाला नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीलाही आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे स्थान मिळाले आहे, असे ते म्हणाले. प्रादेशिक चित्रपटसृष्टीही जागतिक मानांकन या जागतिक नोंदीमुळे प्रसाद प्रभाकर ओक यांचे नाव चित्रपट इतिहासात ठळकपणे कोरले गेले आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटांची वाढती ताकद, कलात्मक समृद्धी आणि जागतिक स्तरावर पोहोचण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे. प्रादेशिक चित्रपटसृष्टीही जागतिक मानांकन मिळवू शकते, याचे हे ठोस उदाहरण ठरले आहे. मराठी चित्रपट आता केवळ राज्यापुरते मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली छाप उमटवत आहेत, हे या गौरवातून स्पष्ट झाले आहे.