
शिवजयंती 2026 निमित्त आयोजित करण्यात आलेल्या खासदार अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानावरून पुण्यातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इरावती कर्वे सभागृहात डॉ. कोल्हे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त करत आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे विद्यापीठात समर्थन आणि विरोध अशा दोन्ही भूमिका स्पष्टपणे पुढे आल्या आहेत. ‘सकल विद्यार्थी समूहा’च्या वतीने कुलगुरूंना सह्यांचे पत्र सादर करण्यात आले आहे. या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा सर्व समाजाचा एकत्रित उत्सव असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा दिवशी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निमंत्रण देणे योग्य नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवजन्मोत्सव विद्यार्थी उत्सव समितीला कार्यक्रमाबाबत पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचाही उल्लेख पत्रात आहे. विद्यापीठ प्रशासनाने अशा कार्यक्रमाला अधिकृत पाठिंबा दिला आहे का, याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला, काही विद्यार्थ्यांनी डॉ. कोल्हे यांच्या समर्थनार्थ स्वतंत्र पत्र सादर केले आहे. विद्यापीठात दरवर्षी विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अभ्यासू आणि प्रेरणादायी वक्त्यांना आमंत्रित केले जाते, असे त्यांनी नमूद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून अमोल कोल्हे यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे. इतिहासाचा अभ्यास आणि प्रेरणादायी विचार मांडण्यासाठी त्यांना व्यासपीठ देणे योग्य असल्याचे मत या विद्यार्थ्यांनी मांडले आहे. मला कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही दरम्यान, या वादावर स्वतः डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही विद्यार्थी संघटनांनी माझ्या व्याख्यानाला विरोध केला असल्याचे कळले आहे, मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून मला कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजता होणाऱ्या व्याख्यानासाठी मी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती देणे हे माझे कर्तव्य आहे आणि अशा कार्यक्रमांना जाताना मी राजकीय भूमिका बाजूला ठेवतो, असेही त्यांनी नमूद केले. पुण्यातील शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधाण या संपूर्ण घडामोडींमुळे पुण्यातील शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एका बाजूला कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येऊ नये, अशी मागणी आहे; तर दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केलेल्या वक्त्याला संधी द्यावी, असा आग्रह आहे. विद्यापीठ प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, कार्यक्रम नियोजित वेळेनुसार पार पडतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवजयंतीसारख्या महत्त्वाच्या उत्सवाच्या निमित्ताने निर्माण झालेला हा वाद पुढील काही दिवसांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.