जिल्ह्यात मोफत प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ
१० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज; २५ टक्के राखीव जागा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : जिल्ह्यातील वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशप्रक्रियेला मंगळवारपासून (ता. १७) अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ९२ पात्र शाळांमध्ये एकूण ८०२ जागा उपलब्ध असून, पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी १० मार्च या अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या योजनेसाठी ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे ते पात्र ठरणार आहेत. अर्ज भरताना आधारकार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारीख प्रमाणपत्र आणि सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे अनिवार्य आहेत. राखीव प्रवर्ग किंवा दिव्यांग असल्यास संबंधित प्रमाणपत्रे आणि भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांसाठी नोंदणीकृत भाडे करारपत्र सादर करणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, पालकांनी राज्यशासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन माहिती अचूक भरावी, कारण अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीमुळे अर्ज बाद होऊ शकतो. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता पालकांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून जिल्ह्यातील एकही पात्र विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे आवाहनही शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
—