
मराठा आरमारातील सागरी संरक्षण व्यवस्थेत महत्त्वाचा असलेला राजकोट किल्ला काळाच्या ओघात विस्मरणात गेला होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ९१ फुटी पुतळ्यानंतर हा परिसर बदलून गेला आहे. सध्या पर्यटक संख्या ६ लाखांवर पोहोचल्याची माहिती किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरू राणे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटक संख्या रोज १ हजारांच्या पुढे जात आहे. ऑफ सीझनलाही रोज पाचशे पर्यटक येथे भेट देतात, असेही ते म्हणाले. होम स्टे आणि सी स्पोर्ट्सनंतर आता प्रतीक्षा शिवसृष्टीची या परिसरात गेल्या सहा महिन्यांतच पर्यटन उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. पंचवीसहून अधिक दुकाने, होम स्टे आणि सी स्पोर्ट्स सुरू झाले आहेत. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या पुतळ्याची देखभाल करण्यात येत आहे. त्याशिवाय, राज्य सरकारने येथे शिवसृष्टी उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. ते कामदेखील लवकरच सुरू होणार असून ते पूर्ण झाल्यावर येथील पर्यटनास अधिक चालना मिळणार आहे