चोरीचा मामला, ऐवजही लांबला
मुद्देमाल हस्तगत करण्यात ठाणे पोलिसांना अपयश; गुन्ह्यांचा आलेख घटला, तरीही कोट्यवधींची ‘लूट’ सुरूच!
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ ः गुन्ह्यांची संख्या घटली, उघडकीचे प्रमाण वाढले, आरोपींना अटक झाली; मात्र चोरीला गेलेला ऐवज अद्याप गायबच आहे. गेल्या दोन वर्षांच्या गुन्हेगारीचा आलेख पाहिला असता ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरीच्या घटनांत घट झाल्याचे दिसते; मात्र सराईत चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना अपेक्षित यश मिळत नसल्याने फिर्यादी हवालदिल झाले आहेत. आकडे दिलासा देतात; पण रिकाम्या हाताने परतणाऱ्या नागरिकांची व्यथा वेगळीच आहे. शहरात चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये २०२४च्या तुलनेत २०२५ मध्ये काही प्रमाणात घट झाली असली, तरी चोरट्यांनी सर्वसामान्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर डल्ला मारणे सुरूच ठेवले आहे. पोलिस प्रशासनाने गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढवले असले, तरी चोरीला गेलेला ऐवज परत मिळवण्यात अजूनही मोठे आव्हान कायम असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
वाढलेली गस्त, शहरभर पसरलेले सीसीटीव्हीचे जाळे आणि ठाणेकरांच्या सतर्कतेमुळे चोरीचे गुन्हे काहीअंशी कमी झाल्याचे म्हटले जाते. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी ही सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. असे असले तरी दररोज सरासरी तीन ते चार वाहने चोरीला जात असून कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास होत आहे. चोरी गेलेला हा मुद्देमाल परत मिळेल, या आशेवर फिर्यादी पोलिस ठाण्यामध्ये धाव घेतात; पण गुणांची ज्या तत्परतेने उकल होत आहे, त्या तुलनेमध्ये मुद्देमाल हस्तगत होत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच २०२४ मध्ये १,५०५ आरोपींना अटक करण्यात आली होती, तर २०२५ मध्ये हा आकडा ५००ने वाढून २,०१३ वर पोहोचला आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही अनेक विभागांत १० ते १५ टक्क्यांनी सुधारले आहे.
घरफोडीतून कोट्यवधींचा ऐवज लंपास
२०२४ मध्ये घरफोडीचे ७८० गुन्हे नोंदवले गेले होते. त्यापैकी ४० टक्के गुन्हे उघडकीस आले. तब्बल २०.२२ कोटींचा माल चोरीला गेला; मात्र त्यापैकी केवळ २.९० कोटींचा ऐवज परत मिळाला. २०२५ मध्ये गुन्ह्यांची संख्या ६८४ वर आली आणि उघडकीचे प्रमाण ५१ टक्क्यांपर्यंत वाढले. तरीही १४.९६ कोटींची चोरी झाली असून फक्त ४.२० कोटींचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
जबरी चोरीची भीती कायम
२०२४ मध्ये २४६ गुन्हे नोंदले गेले होते, त्यापैकी ६७ टक्के उघड झाले. २०२५ मध्ये गुन्हे १५३ वर आले आणि ७४ टक्के उघडकीस आले. तरीही रस्त्यावरची सुरक्षितता पूर्णपणे अबाधित नाही.
सोनसाखळी चोरीमुळे महिलांची चिंता वाढली
२०२४ मध्ये २१३ गुन्हे आणि ७९ टक्के उघडकीचे प्रमाण होते. २०२५ मध्ये गुन्हे १४३ वर आले; मात्र उघडकीचे प्रमाण ६४ टक्क्यांवर घसरले. महिलांमध्ये अजूनही असुरक्षिततेची भावना आहे.
वाहनचोरीचे सर्वात मोठे आव्हान
२०२४ मध्ये १,३५१ वाहनचोरीचे गुन्हे, तर २०२५ मध्ये १,२४८ गुन्हे नोंदले गेले. उघडकीचे प्रमाण अनुक्रमे ३७ आणि ४६ टक्के असले तरी दररोज होणाऱ्या वाहनचोरीमुळे नागरिक त्रस्त आहेत.
तुलनात्मक आकडेवारी
गुन्ह्याचा प्रकार वर्ष २०२४ (गुन्हे) वर्ष २०२५ (गुन्हे) स्थिती
घरफोडी ७८० ६८४ घट
जबरी चोरी २४६ १५३ लक्षणीय घट
सोनसाखळी चोरी २१३ १४३ घट
वाहन चोरी १,३५१ १,२४८ किंचित घट
इतर चोरी १,१८५ १,०८३ घट