येत्या २०२९ च्या विधानसभेत ‘नो कॉम्प्रमाईज’
रामकृष्ण वेताळ; वडोली निळेश्र्वरला विद्या वेताळांची विजयी सभा
कोपर्डे हवेली, ता. २० : जिल्हा परिषदेमध्ये धनशक्ती विरुद्धची लढाई आपण जिंकली; परंतु या विजयाने हुरळून जाऊन चालणार नाही. अजून मोठी लढाई लढायची आहे. जिल्हा परिषद तो झाँकी है, कऱ्हाड उत्तर अभी बाकी है. आता थांबायचं नाही, २०२९ च्या विधानसभेत कोणत्याही परिस्थितीत काॅम्प्रमाईज केलं जाणार नाही. यशवंतराव चव्हाण यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०२९ ची विधानसभा लढवणारच, असा इशारा रामकृष्ण वेताळ यांनी दिला.
वडोली निळेश्वर येथे आयोजित केलेल्या नूतन सदस्या विद्या वेताळ यांच्या विजयी सभेत ते बोलत होते. सुरेश पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी सचिन नलवडे, दयानंद पवार, अमित पाटील, नीलम पिसाळ, राम पाटील, प्रकाश पाटील, श्रीरंग चव्हाण, रंगराव चव्हाण, पैलवान अक्षय चव्हाण, ॲड. महादेव साळुंखे, पांडुरंग झंजे, रोहित डुबल, माधुरी पवार आदी उपस्थित होते.
श्री. वेताळ म्हणाले, ‘‘पक्षातून मी बाहेर जावे, यासाठी काहींनी देव पाण्यात घातले आहेत. आता एकाला विधान परिषदेचे डोहाळे, तर दुसऱ्याला पुढच्या विधानसभेचे डोहाळे लागले आहेत. चिमणीने बांधलेल्या घरट्यात कावळा शिरला आहे. त्याला हाकलून देऊ या. कोणावर टीका टिप्पणी करणे आपली संस्कृती नाही. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार राहा.’’
श्री. नलवडे म्हणाले, ‘‘परक्यांऐवजी घरच्यांची सोबत करूया. कऱ्हाड उत्तरचा स्वाभिमान जपायचा असेल आणि आपला माणूस विधानसभेत पाठवायचा असेल, तर रामकृष्ण वेताळ यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.’’
यावेळी विद्या वेताळ यांनी मतदारांचे आभार मानून विकासाचे आश्वासन दिले. रोहित डुबल यांनी प्रास्ताविक केले. दिनेश घाडगे यांनी आभार मानले.
……………
B02445
वडोली निळेश्वर ः विजयी सभेप्रसंगी विद्या वेताळ, रामकृष्ण वेताळ यांचा सत्कार करताना ग्रामस्थ, कार्यकर्ते. (जयंत पाटील : सकाळ छायाचित्रसेवा)
…………………………………