वडगाव मावळ, ता. २० : येथील कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. वसतिगृहातील प्रीतम हिले, संग्राम भगत, हरेश्वर गवारी तसेच गोपाळ बालक मंदिरमधील नेहल सूर्यवंशी, कृष्णाली काळंगे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथा, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेबद्दल भाषणे केली. काही विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते आणि मनोगते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वसतिगृह अधीक्षक सोमनाथ वैद्य यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे अनुकरण करून प्रामाणिकपणा, शिस्त आणि देशभक्ती यांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. निखिल ठिकडे यांनी सूत्रसंचालन केले. सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यात आला.