वेण्णानगरपासून वेळ्यापर्यंत खड्ड्यांचे जाळे
वाहनचालकांकडून दुरुस्तीची मागणी; संरक्षक भिंतीची कामेही अपुऱ्या स्थितीत
कास, ता. २० : सातारा ते मेढा या मुख्य मार्गावर असलेल्या वेण्णानगर गावातून पुढे जावळी तालुक्यातील कुसुंबीमार्गे मेढ्याला जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे; परंतु सातारा तालुक्याच्या हद्दीतील वेण्णानगर ते वेळे गावापर्यंतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले असून, वाहनचालकांची मोठी कसरत होत आहे.
खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. वेण्णानगरवरून पुढे जाताना चोरगेवाडी, जोतिबाचीवाडी, आगुंडेवाडी, वेळेकामथीवरून पुढे जावळी तालुक्यातील सायळी गावातून धनकवडी, निझरे, कुसुंबी आदी अनेक गावे या रस्त्यावर येतात. अनेक गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याचे काम काही वर्षांपूर्वीच झाले; परंतु सातारा तालुक्यातील वेण्णानगर ते वेळेकामथीपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याच रस्त्यावर चोरगेवाडी गावच्या हद्दीत नुकतेच दोन संरक्षक भिंतींचे काम झाले असून, ही कामेही व्यवस्थित झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संरक्षक भिंतीसाठी खोदलेल्या रस्त्यावरही मोठे खड्डे पडले आहेत, तर संरक्षक भिंती अपुऱ्या बांधल्याने रस्ता अरुंदच राहिला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी दोन वाहने समोरासमोर आल्यास अडचण होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तत्काळ भरावेत व चोरगेवाडी हद्दीत नुकत्याच झालेल्या संरक्षक भिंतींच्या कामाची तपासणी व्हावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
फोटो :……….04606
आगुंडेवाडी : वेण्णानगर ते वेळेदरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे.
……………………………………………………………