उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : महापालिकेतील कथित टीडीआर घोटाळा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी ठोस कारवाई होत नसल्याचे सांगत आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी थेट मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नगरविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्या दालनाबाहेर १२ मार्चला आंदोलन करणार असल्याचे त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
२८ ऑगस्टला झालेल्या बैठकीत टीडीआरसंदर्भात स्थगिती देण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले होते. त्यापैकी केवळ टीडीआर क्र. १४ वरच स्थगिती देण्यात आली. टीडीआर क्र. १७ व १८ बाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. विशेष म्हणजे संबंधित टीडीआरच्या विक्रीवर आधारित बांधकामांनाही स्थगिती देण्यात आलेली नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे, असे कडू म्हणाले. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनीही १३ फेब्रुवारीला पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने बच्चू कडू यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि महापालिका प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.