कळस, ता. १९ ः इंदापूर तालुक्यातील सिंगल फेज फिडरवर रात्रीच्या वेळी करण्यात येणारे सुमारे १६ तासांचे भारनियमन तात्पुरते खंडीत केले आहे. रात्रीच्या वेळी फिरडवर वाढलेला भार कमी करण्यासाठी वीज वितरण कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. शेती पंपाना दिवसा ८ तास वीजपुरवठा करण्याबरोबर रात्रीच्या वेळी सिंगल फेजच्या माध्यमातून घरगुती वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन केल्याने, सध्या तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बारामती विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी १६ फेब्रुवारीला लेखी पत्राद्वारे उपविभागांना सिंगल फेजवरील भार कमी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दिवसभराच्या वापराच्या तुलनेत रात्रीच्या वीज वापराचा भार २० टक्क्यांपर्यंत ठेवण्याचे सांगितले होते. वीस टक्क्यांपेक्षा अधिकचा भार वाढल्यास वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत होता. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात झाली. मात्र, महावितरणच्या या भूमिकेमुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. एकीकडे दहावी- बारावीच्या परीक्षांचा कालावधी सुरू असताना, दुसरीकडे रात्रभर वीज गायब होत असल्याने विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली होती.
याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच हे भारनियमन रोखण्याबाबत वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलली आहेत. रात्रीच्या वेळी जुगाड करून सिंगल फेज वीजपुरवठ्यातून थ्री फेज विद्युत पंप चालविणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातून रात्रीचा भार कमी करून घरगुती वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम केले जाणार आहे.