इंदापूरच्या कोरड्या मातीला ओला सांगावा

कळस, ता. २० : इंदापूर तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतातील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असतानाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी (ता. १८) खडकवासला कालव्यातून शेती सिंचनासाठी सोडण्यात आलेले आवर्तन रविवारी (ता. २२) तालुक्यात दाखल होण्याचा अंदाज जलसंपदा विभागाने वर्तवला आहे. ‘टेल टू हेड’ या पद्धतीने देण्यात येणारे हे आवर्तन तालुक्यातील तहानलेल्या पिकांसाठी वरदान ठरणार आहे.
इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून, उभ्या पिकांची पाण्याची गरज वाढली आहे. पिण्याच्या पाणी योजना अवलंबून असलेले तलाव कोरडे पडले आहेत. विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठलेला आहे. शेततळ्यांची पाणी पातळी खालावली आहे. अशा परिस्थितीत पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि फळबागांना पाण्याची अत्यंत गरज आहे. गत आवर्तनास दोन महिन्यांचा कालावधी होत आला आहे. या आवर्तनाचा प्रामुख्याने ऊस, चारा पिके आणि फळबागांना मोठा आधार मिळणार आहे. विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी सुटण्यास मदत होईल. मात्र, इंदापूर तालुक्यातील सिंचन पूर्ण झाल्याशिवाय इतर तालुक्यात पाणी देवू नये, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart