भिगवण, ता. २० : येथील २१ वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणाला शुक्रवारी (ता. २०) नवे वळण मिळाले. अपहरण झाल्याची तक्रार दाखल झालेल्या तरुणीनेच गुरुवारी (ता. १९) मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर राहून, ‘आपले अपहरण झाले नसून, सदर तरुणांसमवेत स्वखुशीने गेले आहे,’ असा खुलासा प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केला.
भिगवण (ता. इंदापूर) येथे आई आणि भावासोबत असलेल्या तरुणीचे दोन तरुणांनी तिघांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अपहरण केल्याची तक्रार
तरुणीच्या नातेवाइकांनी मंगळवारी (ता. १७) भिगवण पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणामुळे भिगवण व परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. तसेच, आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा काढून अपहरण झालेल्या तरुणीला तिच्या नातेवाइकाच्या ताब्यात देण्याची व आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.
दरम्यान, या तरुणीने बुधवारी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट करत, ‘आपले अपहरण झाले नसून, आपण स्वखुशीने सदर तरुणासोबत गेलो,’ असे सांगतिले. तर, गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास या प्रकरणातील तरुण व तरुणी बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी या तरुणीने, ‘आपण स्वमर्जीने तरुणासोबत गेलो,’ असे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले. तसेच, १७ फेब्रुवारीला भाऊ व आईसमवेत भिगवण बाजारपेठेमध्ये वस्तू खरेदीसाठी जाणार असल्याची माहितीही आपण स्वतः सदर तरुणाला दिली. तसेच, ‘तू भिगवण येथील शासकीय विश्रामगृहामागे ये, तेथून आपण आई व भावाची नजर चुकवून निघून जावू,’ असा फोन त्याला केल्याचे सांगतले. ‘त्याप्रमाणे या तरुणांसोबत आपण स्वखुशीने निघून गेले. त्यावेळी आई किंवा भाऊ यांच्यावर कोणताही हल्ला किंवा मिरची पुड टाकली नाही,’ असेही तिने सांगितले.