‘माझी वसुंधरा’मध्ये
वरुड गाव ठरले मानकरी…
पुणे विभागात प्रथम क्रमांकासाठी निवड
शासनाकडून ५० लाखांचे बक्षीस जाहीर
राजेंद्र शिंदे : सकाळ वृत्तसेवा
खटाव, ता. २० : पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत खटाव तालुक्यातील वरूड गावाने अभिमानास्पद यश मिळवले आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पुणे विभागातून वरूड गावाची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. शासनाने या गावास ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियानात उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाची घोषणा शासनाच्या पर्यावरण विभागाने मंगळवारी (ता. १७) केली. राज्य सरकारकडून पर्यावरण विभागामार्फत राज्यात मागील पाच वर्षांपासून माझी वसुंधरा अभियान पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पाच संकल्पनांवर राबविण्यात आले.
माझी वसुंधरा ५.० या अभियानात राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग नोंदवला. अभियान कालावधीत डेस्कटॉप मूल्यांकन व फील्ड मूल्यमापन हे त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात आले. दोन्ही मूल्यमापनातील सर्वाधिक एकूण गुणाचे आधारे प्रत्येक विभागातून लोकसंख्येच्या निकषाच्या आधारे निवड करण्यात आली. वरुड ग्रामपंचायतीला ५.० मध्ये एक हजार लोकसंख्येच्या आत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पुणे विभागात अव्वल स्थान मिळवले असून, राज्य शासनाने ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
या यशामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त होत आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ योजना नसून सामूहिक जबाबदारी आहे, असे मत गावातील नागरिकांनी व्यक्त केले. दरम्यान, या यशाबद्दल तालुक्यातून ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन, मतभेद विसरून, स्वच्छतेपासून सौरऊर्जेपर्यंत, वृक्षारोपणापासून पर्यटनस्थळ विकसित करण्यापर्यंत, शाश्वत ग्रामविकास साधला आहे.
हे अभियान राबवत असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी योगेश कदम, विस्तार अधिकारी बोइनवाड, ग्रामपंचायत अधिकारी नरेंद्र जगदाळे, अपूर्वा चव्हाण, सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
…………………………………….
वरुड गावाने काय केले…
गाव पातळीवर २०२१ पासून पावणेतीन एकरांत उभं केलेलं मियावाकी जंगल, दुतर्फा वृक्षारोपण, फळबाग लागवड, प्लॅस्टिकमुक्त उपक्रम, जलसंवर्धनमध्ये लोकसभागातून गेली सात वर्षे सातत्याने केलेलं काम, कचरा व्यवस्थापन, श्रमदान आणि स्वच्छता मोहिमा प्रभावीपणे राबविल्यामुळे ही निवड करण्यात आली. ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक, महिला बचत गट, तसेच युवक मंडळांच्या सहभागातून पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्यात आले.
………………………………….
फोटो :………..01339
वरुड : एकेकाळी दुष्काळी गाव म्हणून परिचित असलेल्या गावात लोकसहभागातून निर्मिलेला उल्लेखनीय जलप्रकल्प.
…………………………………………………….