![]()
अभिनेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचे पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. परंतु, या व्याख्यानाला काही संघटनांनी विरोध केल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, जोपर्यंत तुम्ही छत्रपती मांडताय तोपर्यंत या महाराष्ट्रात कोणाच्या बापाला घाबरायचे नाही. तसेच छगन भुजबळ हे राज्यसभेवर जातील, असे अजितदादा ओघात म्हणाले असल्याचा गौप्यस्फोट देखील कोल्हे यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, मला विरोध का केला गेला हे मला माहित नाही. परंतु सावित्रीबाई फुले विद्यापीठाने मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे व्याख्यान आयोजित करायचे होते, या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती. त्यानुसार मला विद्यापठाणे निमंत्रण दिले. मला आत्ता काही माध्यमकर्मींकडूनच समजत आहे की काही संघटनांनी मला विरोध केला आहे. परंतु, यांची कुठलीही कल्पना नाही. आज मी इतह इथे आलो आहे. माझी विरोध करणाऱ्यांना विनंती आहे, की त्यांनी माझे व्याख्यान ऐकावे आणि प्रश्न विचारा. छत्रपतींची भूमिका साकारतो तेव्हा राजकारणाचे जोडे बाहेर ठेवतो पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, विरोध करणे ही काही नवीन गोष्ट नाही. कारण ज्या छत्रपतींच्या विषयी बोलायला येतोय, त्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला देखील विरोध झाला आहे. याच पुण्यात त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याला देखील विरोध झाला आहे. पहिला पुतळा उभारण्याला सुद्धा विरोध झाला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही तब्बल 180 वर्ष लोकांच्या स्मरणात राहिली नाही. याही वस्तुस्थिती आहेत. त्यामुळे मला असे वाटते की कुठलेही व्याख्यान करणे विद्यार्थ्यांशी संवाद साधणे हा वैचारिक भाग आहे. आणि मी जेव्हाही छत्रपतींची भूमिका साकारतो तेव्हा राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून करतो. विरोधाला चेहरा नसतो तेव्हा विचारांची भीती असते तसेच मला असे वाटते की जेव्हा विरोधाला चेहरा नसतो तेव्हा विचारांची भीती ही त्यांच्या मनात बसलेली असते तेव्हा विरोधाला असा कोणतातरी मुखवटा घेऊन पुढे यायचा प्रयत्न होतो, तसा काही प्रकार असेल, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले. तसेच चेहरा जर समोर आला असता आणि नेमका काय विरोध आहे हे कळले असते तर मला त्यांच्याशी संवाद सधायला बरं वाटलं असतं, असेही कोल्हे यांनी म्हटले. पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती मांडत असताना बाबा कधी कोणाला घाबरायचं नसतं, कधी कोणाचा इतर विचार करायचा नसतो. जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे छत्रपती मांडताय न तोपर्यंत कोणाच्या बापाला या महाराष्ट्रात घाबरायचे कारण नाही. छगन भुजबळ राज्यसभेवर जातील – अमोल कोल्हे दरम्यान, एका ठिकाणी पत्रकारांशी बोलताना अमोल कोल्हे यांना राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारला. यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, छगन भुजबळ हे फार मोठे नेते आहेत आणि मी त्यांचा त्रागा समजू शकतो. कारण जी काही आधी चर्चा झाली होती, आता विशेषत: जातनिहाय जनगणना होत असताना, ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेत नसताना, छगन भुजबळ यांच्यासारखे वरिष्ठ नेते संसंदेत असणे ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आमच्यात जी काही प्राथमिक चर्चा झाली होती त्यामध्ये अजित दादांनी एकदा आम्हाला ओघाने सांगितले होते की, कदाचित छगन भुजबळ हे राज्यसभेवर असतील, अशी एक चर्चा आमची अंतर्गत झाली होती, असा गौप्यस्फोट कोल्हे यांनी केला आहे.